
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर);
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी मधील तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी, नियतक्षेत्र, गंगासागर हेटी बिट, कक्ष क्रमांक 90 मध्ये बल्लारशा गोंदिया रेल्वे ट्रॅक लगत नागभीड कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेमध्ये तीन चितळ्यांचे मृत्यू झाल्याची घटना दि.19 मे 2024 रोजी रात्री 10 वाजतांच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तथा तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी स्वाब संस्थेचे सदस्य घटना स्थळी जाऊन मोक्का पंचनामा करून रात्री दोन वाजता तिन्ही मृत चितळांना वनविभागाच्या सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणून आज सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यापैकी एक चार वर्षे वयाचा नर तर दोन मादा चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून दोन्ही मादा चितळ हे गर्भावस्थेत असल्याने शवविच्छेदन केल्यानंतर त्यापैकी एका मादा चितळ चा अभ्रक हा पूर्ण विकसित असून तीन ते चार दिवसात बाळंतपण होण्याची शक्यता होती तर दुसरी मादा चितळ्याच्या बाळंतपणाला एक आठवडा वेळ होती त्यामुळे दोन्ही मादा चितळ त्यांच्या गर्भामध्येच नव्याने जन्माला येण्याआधीच दोन नर चितळ मारले गेलेले आढळून आले. अशाप्रकारे पाच चितळाचा मृत्यू रेल्वेच्या धडकेत झाला.
फक्त एकच इंजिन असून त्याने रेल्वेची पाहणी करत असताना चितळाचा कळप न दिसता त्याला धडक देणे हे आश्चर्याचेच आहे. तर यावरून त्यांना ट्रॅक वरील चुकीच्या आणि धोकादायक बाबी निदर्शनात येत असतील काय ? हा प्रश्न उद्भवणे हा साहजिकच आहे. कारण यापूर्वी सुद्धा त्याच इंजिनने नागभीड वनपरिक्षेत्रालगत काही दिवसापूर्वी एका वाघाच्या बसला धडक देऊन ठार केले होते अशा पद्धतीने रेल्वे कडून सर्रास वन्यजीवांची कत्तल सुरू झालेली आहे वन विभागाने यांच्यावर कठोर कारवाई का करू नये ? असाही प्रश्न परिसरातील लोकांनी उपस्थित केलेला आहे.
*”विशेष म्हणजे गोंदिया – बल्लारशाह रेल्वे लाईन ही ताडोबा आणि ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलामधूननच गेलेली असल्यामुळे या रूटवर सतत वन्यजीव मृत पावल्याच्या घटना घडतात, यामध्ये चिचपल्ली- मुल- नागभीड- तळोधी – शिंदेवाही या परिसरामध्ये वाघ, अस्वल , बिबट ,आणि सांबर चितळ, नीलगाय, रानगवा, अशा पद्धतीचे वन्यजीव सतत मरत असतात त्यामुळे जंगलातून चालणाऱ्या रेल्वेची वेग मर्यादा ही कमी असावी. तसेच दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाळीचे कुंपण केलेले असावे जेणेकरून या प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही, सोबतच रेल्वे विभागावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यायला हवा जेणेकरून अशा दुर्दैवी घटना कमी करता येतील”* – यश कायरकर , अध्यक्ष, ‘स्वाब नेचर केअर फाउंडेशन.’
सदर घटनेचे शवविच्छेदन डॉ. बनाईत पशु चिकीत्सक तळोधी बा.यांनी केले, यावेळी तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कंन्नमवार , तळोधी चे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाळ, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य सर्पमित्र जिवेश सयाम, व इतर सदस्य उपस्थित होते.
