ब्रम्हपुरी वन विभागात राईस मील मधून केमिकलयुक्त पाणी संरक्षित जंगलात सोडण्याचा गंभीर आरोप ; कठोर कारवाईची मागणी

0
174

ब्रम्हपुरी : संरक्षित जंगल, जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास व वन्यप्राण्यांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, याविपरित चक्क राईसमिल मधील केमिकलयुक्त पाणी थेट संरक्षित जंगलात , वन्यप्राण्यांचा अधिवासात सोडत असल्याचा प्रकार ब्रम्हपुरी वनविभागात कक्ष क्र ८४१ मध्ये सुरु आहे.

या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्य प्राण्यांसह जंगलालाही धोका निर्माण होत आहे. याकडे  ब्रम्हपुरी वनविभागाने गांभीर्याने लक्ष देत संबंधित व्यक्तीवर उचित कारवाई करावी व या जंगलात सोडल्या जाणाऱ्या केमिकल युक्त पाण्याचा निचरा करून हा जंगलात जाणारा पाणी बंद करण्यात यावा.
ब्रम्हपुरी – नागभीड मुख्य महामार्गालगत डाव्या बाजुला असलेल्या एका राईसमिल धारकाकडून चक्क रस्त्याच्या खालून भूमिगत पाईप टाकून मिलमधील केमिकल युक्त पाणी रस्त्याच्या उजव्या बाजूला सायगाटा संरक्षित जंगल गट क्र. ८४१ मध्ये सोडण्यात येत आहे. सायगाटा मधून पुढे लाखापुर जंगल परिसरात हे दूषित पाणी पोहचते. या जंगलात वाघ, बिबट यांच्यासह अस्वल, हरीण, रानगवा, चितळ, मोर तथा अनेक वन्य प्राण्यांचा मोठा अधिवास आहे. सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास केव्हा ही धोका निर्माण होऊ शकतो. तर त्यांचा अधीवसही धोक्यात आलेला आहे.राखीव किंवा संरक्षित जंगलात सामान्य नागरिकांना प्रवेश करता येत नाही. असे आढळून आल्यास त्यांच्यावर वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. वन्यजिवांची शिकार झाल्यास कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या केमिकल युक्त पाण्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास व अधिवासाला गंभीर धोका होण्याची शक्यता व वन्य जीवांची प्राणहानी होण्याची दाट शक्यता असून वन विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. असे असूनही अजूनही हे केमिकल युक्त पाणी जंगलात प्रवाहित होतच आहे. वन कायद्यानुसार सदर मील मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वन्य प्रेमिंकडून करण्यात येत आहे.
ब्रम्हपुरी वनविभाग उत्तर- दक्षिण असा ३० हजार हेक्टर मध्ये विस्तीर्ण पसरला आहे. येथील जैवविविधता पोषक असल्याने वाघांसह अनेक वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आढळून येतो. वाघ व बिबट यांच्या प्रजणनाकरिता उत्कृष्ट जंगल असल्याने वाघ व बिबट (मादी) यांच्यासह अनेक वन्य प्राणी जंगलात पिलांना जन्म देतात.त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. मानव – वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या घनदाट जंगलाला संरक्षित घोषित करण्यात येते.                      

“नगाभिड महामार्गावरील  राईस मील मधून मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त पाणी संरक्षित जंगलात सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे वन्य प्राणी व वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. सदर मील मालकावर वनविभागात तर्फे कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई का होत नाही ही आश्चर्याची बाब आहे. या संदर्भात मुख्य वनसंवरक्षक चंद्रपूर यांच्याकडे मी कारवाईची मागणी करणार आहे.”
– विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर

आर. एफ. ओ. यांना या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी पाठवितो. मिलचे केमिकल युक्त पाणी जंगलात सोडण्यात येत असेल तर वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल“.
-दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here