
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (TATR) वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ६३ चीतलांचे नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (NNTR) यशस्वी स्थानांतरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण मोहीम शून्य मृत्यु दरासह (Zero Mortality) पूर्ण करण्यात आली आहे.
प्रक्रियेचा पहिला टप्पा २१ नोव्हेंबर २०२५ रोजी राबविण्यात आला होता, ज्यामध्ये १० चीतलांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित चीतलांना सुरक्षितरीत्या हलविण्यात आले.
चीतलांचा अत्यंत संवेदनशील स्वभाव लक्षात घेता ही संपूर्ण मोहीम अपार दक्षता, शास्त्रीय पद्धती आणि नीटस नियोजनाचा उत्कृष्ट नमुना मानली जात आहे.
ही मोहीम ताडोबाचे क्षेत्र सहाय्यक डॉ. प्रभुनाथ शुक्ला आणि उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
स्थानांतरणाच्या वेळी ताडोबा कोअरचे DFO सचिन शिंदे, तसेच अतुल देवकर, बापू येले, ACF विवेक नातू, RFO विशाल वैद्य आणि कोलारा पथक उपस्थित होते.
TATR आणि NNTR यांच्या संयुक्त आणि प्रभावी समन्वयामुळे ही संवेदनशील प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून, दोन्ही व्याघ्र प्रकल्पांमधील वन्यजीव व्यवस्थापनासाठी हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.


